मुंबई: करोनाच्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवून केली आहे. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण देश गेले दोन महिने टाळेबंदीत आहे. टाळेबंदी शिथिल झाली तरी करोना संपला असे होणार नाही. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी, असा थेट सवाल राज यांनी आपल्या पत्रातून राज्यपालांना केला आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगाने करावा, असे मत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. तर, राज्यपाल परीक्षा घेण्याबाबत आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
राज ठाकरेंच्या पत्रातील ठळक मुद्दे
१) करोनाचा प्रादुर्भाव किती भयंकर आहे याची कल्पना आपल्याला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय?
२) अर्थव्यवस्थेचं अपरिमित नुकसान होत असतानाही केवळ जीव वाचावे म्हणून संपूर्ण देशानं टाळेबंदी झेलली. मग याच न्यायानं विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?
३) परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट पास करणे असा याचा अर्थ होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या, विद्यापीठातील अंतर्गत गुणांच्या आधारावर किंवा विद्यार्थ्यांना काही प्रोजेक्ट्स देऊन किंवा अन्य मार्गाने अंतिम परीक्षेचा निकाल लावता येईल.