नांदेड: जिल्ह्यातील किनवट शहरातील मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी सुनील ईरावार यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. मात्र मृत्युपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून यात त्याने ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफीही मागितली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्याने आत्महत्या केली आहे. राजकारणात जात आणि पैसे दोन्ही गोष्टी लागतात, माझ्याकडे यापैकी काहीच नाही असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. ‘अखेरचा जय महाराष्ट्र, राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टीवर राजकारण आहे. दोन्ही माझ्या जवळ नाही.”जय महाराष्ट्र..जय राज साहेब..जय मनसे अशी सुसाईड नोट त्याने लिहिली आहे.
या पुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिनी, छोटी वहिनी, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही, तरी पण तुम्ही सर्वजण मला माफ कराल अशी अपेक्षा आहे असं या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
मात्र शहराध्यक्ष सुनील ईरावार यांच्या आत्महत्येने कार्यकर्त्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.