ठाणे । ठाणे महापालिका परिवहन सेवची ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी सुरू केलेली ठाणे मंत्रालय ही बससेवा अखेर बंद झाली. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च व पुरेसे प्रवासी नसल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय होईल. त्यामुळे आता ठाणेकरांना मुंबईला जाण्यासाठी बेस्टच्या बसेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. या बसची फारशी प्रसिद्धी न केल्यानेच ही बस बंद करण्याची वेळ आली असल्याचा आरोप यावेळी काही सदस्यांनी केला. ठाण्यातून मुंबईला कामाला जाण्यासाठी ठाण्यातील सर्वच नागरिकांना ठाणे रेल्वेस्थानक गाठावे लागते. ठाणे रेल्वेस्थानकांमधून दररोज 7 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात, तर उर्वरित प्रवाशांना बसवर अवलंबून राहावे लागते. मुंबईला जाण्यासाठी इतर प्राधिकरणाच्या बसेस असल्या तरी ठाणे परिवहन सेवेने खास ठाणेकरांसाठी कॅडबरी ते मंत्रालय, अशी बससेवा सुरू केली. मात्र, ही बस पूर्णपणे तोट्यात चालली असल्याचा महत्त्वाचा मुद्दा परिवहन सदस्य तकाकी चेऊलकर यांनी उपस्थित केला. 144 क्रमांकाची ही बससेवा दीड महिन्यापूर्वी कॅडबरीपासून सुरू केली. केवळ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या बसच्या केवळ दोनच फेर्या सरू होत्या. सकाळी 8 पासून आणि संध्याकाळी साडेचार वाजता ठाण्यातून ही बस सुटते, तर सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 वाजता मुंबईहून ही बस सुटते. चेऊलकर यांनी या बसबाबत परिवहनच्या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. ही बससेवा जेव्हापासून सुरू करण्यात आली आहे तेव्हापासून या बसला प्रवासी संख्या फारच कमी आहे. याशिवाय 1 हजार 200 रुपयांचे रोजचे उत्पन्न असताना खर्च 5 हजार रुपयांवर असल्याने ही बससेवा का सुरू ठेवली आहे, ती बंद का करण्यात येत नाही असे प्रश्न चेऊलकर यांनी उपस्थित केले. ठाणे परिवहन सेवेच्या आधी बेस्टने ठाणे ते मंत्रालय अशी वातानुकूलित बससेवा सुरू केली होती.
परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक यांनी मात्र या बसची प्रसिद्धी व्यवस्थित न केल्याने प्रवासी संख्या कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ठाणे परिवहन सेवेने खास ठाणेकरांसाठी मुंबईला जाण्यासाठी ही बससेवा सुरु केल्याने ठाणे परिवहनसाठी ही भूषणाव गोष्ट आहे. त्यामुळे योग्य प्रसिद्धी न झाल्याने ही सेवा बंद झाली असल्याचा आरोप महाडिक यांनी यावेळी केला. परिवहन सभापती अनिल भोर यांनी मात्र या बसचे रूट बदलून उत्पन्न वाढते का याची चाचपणी करावी अशी सूचना केली. मात्र, चेऊलकर यांनी बसला प्रवासी नाहीत. त्यामुळे ही बस बंदच करावी, अशी मागणी केली. त्यामुळे प्रशासनाने ही बस बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना भोर यांनी केली.
लोकप्रतिनिधींनी केली होती मागणी
प्रशासनाची बाजू मांडताना परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी मात्र ही बससेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. बेस्टची सेवा बंद झाल्यानंतर ठाणेकरांसाठी ही बससेवा सुरु करावी, अशी मागणी त्यावेळी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यांच्या मागणीनुसारच ही सेवा सुरू करण्यात आली होती. आता जर बसला प्रवासी नसतील, तर ही सेवा बंद करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी या बैठकीमध्ये दिली.