जळगाव: शहरातील रामेश्वर कॉलनीत लग्नासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील नातेवाईकांची चारचाकीतून गहाळ झालेली अडीच लाखांचे 5 तोळे दागिणे व इतर वस्तू असलेली बॅग परत करुन रामेश्वर कॉलनीतील चंदनसिंग मंगलसिंग चव्हाण व यश चंदनसिंग चव्हाण या बाप लेकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. 12 डिसेंबर रोजी दुपारी घडलेल्या प्रकारानंतर दोघांनी बॅग एमआयडीसी पोलिसात आणून दिली. यानंतर पोलिसांनी संबंधितांना बोलावून बॅग सुरक्षित मुद्देमालासह स्वाधीन केली. दोघा बाप लेकाच्या प्रामाणिपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मध्यप्रदेशातील हिरापूर येथील धर्मेंद्र महेश पाटील वय 36 हे 10 डिसेंबर रोजी एमआयडीसीतील महालक्ष्मी दाल मील येथे असलेल्या चुलत भावाच्या लग्नासाठी जळगावात आले होेते. लग्न आटोपल्यावर आज 12 डिसेंबर रोजी धर्मेंद्र पाटील हे त्यांचे रामेश्वर कॉलनतील नातेवाईकांच्या भेटीसाठी गेले. त्यांची भेट घेवून त्यांनी त्यांच्या गाडीच्या डिक्कींमध्ये कपडे, दागिण्यासह इतर वस्तू असलेल्या बॅगा ठेवल्या. गावी परतण्यापूर्वी ते पुन्हा कस्तूरीमार्गे लग्न असलेल्या महालक्ष्मी दालमील येथे गेले. त्याठिकाणी दोन बॅगा ठेवत असता, गाडीची डिक्की उघडी दिसली. यातील पाच तोळे अडीच लाखांचे दागिणे व इतर साहित्य असलेली एक बॅग गहाळ झाल्याचे दिसून आले. यानंतर धर्मेंद्र पाटील यांनी मार्गावरील सीसीटीव्ही तपासले असता, यात दोन जण रस्त्यावर पडलेली बॅग उचलत असल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना पाठविला. तसेच तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. तक्रार दाखल करत असतांनाच, सापडलेली सदरची बॅग एमआयडीसी पोलीस ठाण्यात परत करण्यासाठी येत असलेल्या चंदनसिंग मंगलसिंग चव्हाण, व त्यांचा मुलगा यश चंदनसिंग चव्हाण या दोघांना सोबत घेवून पोलीस कॉन्स्टेबल सुधीर साळवे, असीम तडवी, चेतन सोनवणे, किशोर पाटील यांनी पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी पोलीस निरिक्षक प्रताप शिखारे यांच्या हस्ते धर्मेंद्र पाटील यांना त्यांचा अडीच लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग परत देण्यात आली. यावेळी धर्मेंद्र पाटील यांनी चंदनसिंग चव्हाण व यश चव्हाण यांचे आभार मानले. पोलिसांनीही दोघांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.