जळगाव : महानगर पालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथक सुभाष चौकात नियमीत कारवाईसाठी गेले होते. यावेळी पथकाने तेथील विक्रेत्याची हातगाडी व नारळाचे पोते जप्त केले. जप्तीची कारवाई पथकाद्वारा करण्यात आल्याने विक्रेत्याचा मुलगा व अतिक्रमण पथकात वाद झाला. यावेळी विक्रेत्याच्या मुलास पथकातील कर्मचार्यांनी वाहनावरुन खाली फेकल्याचा आरोप करीत हॉकर्सनी आपला रोष व्यक्त केला. शुक्रवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेची अतिक्रमण विभागाचे पथक या ठिकाणी तैनात होते. यावेळी सुभाष चौकात रविंद्र रामदास चौधरी यांनी नारळ विक्रीची हातगाडी लावली होती. पथकाने त्यांना याठिकाणी हातगाडी लावू नये असे सागींतले यावेळी त्यांच्यात वाद झाला. अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांनी चौधरी यांनी हातागाडी व नाराळ भरलेले पोते जप्त करुन अतिक्रमण विभागाच्या वाहनात ठेवले.
वाद वाढल्याने बघ्यांनी केली गर्दी
या घटनेमुळे सुभाष चौकात विक्रेता व महापालिका कर्मचार्यांमध्ये वाद निर्माण झाला. यावादावादीचे रुपांतर बाचाबाचीत झाले. त्यामुळे सुभाष चौकात लोकांनी गर्दी केली होती. विक्रेता रविंद्र चौधरी यांचा तरुण मुलगा शुभम याठिकणी होता. त्याने महापालिकेच्या वाहनात चढून नाराळाचे पोते काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकातील कर्मचारी यांनी त्यास विरोध करण्याच्या प्रयत्न केला. यातच शुभम गाडीवरुन खाली पडला. त्याला मनपा कर्मचारी यांनी खाली फेकल्याचा आरोप करीत हॉकर्स यांनी संताप व्यक्त केला. शुभम हा यात किरकोळ जखमी झाला.
म्युनिसिपल कॉलनीजवळ कारवाई
शहरातील रामानंद नगर परिसरातील म्युनिसिपल कॉलनीजवळ असलेल्या शिवरोडवर पाच ते सहा घरे अतिक्रमण करुन बांधण्यात आली होती. याबाबत आलेल्या तक्रारीवरुन अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज शुक्रवारी दुपारी याठिकाणी अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांच्यासह पथकाने कारवाई केली. येथेही काही जणांनी विरोध केल्याने गोंधळ झाला. मात्र, रामानंद नगर ठाण्याचा पोलिस बंदोबस्त असल्याने कारवाई करण्यात आली.