पुणे । ‘ओम् नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नम:… मोरया, मोरया…’च्या जयघोषाने तब्बल 31 हजारपेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्रीशक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे 4 वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली.
गणेश नामाचा जयघोष करीत ॠषिपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या आवेश पहायला मिळाला. निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महापौर मुक्ता टिळक, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव यांसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे 31 वे वर्ष होते.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, महिलांशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. स्वातंत्र्याकरीता देखील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्त्रीच्या सद्भावना घरातच राहण्यापेक्षा समाजात याव्या, तरच समाजात शांती निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. अशोक गोडसे म्हणाले, तब्बल 31 वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा, याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या विचारातून या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ 101 महिलांपासून सुरू झालेल्या उपक्रमात आज 31 हजार महिला सहभागी झाल्या आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी मनोगत व्यक्त केले.
भक्ती, शक्ती, सद्भाव, प्रेम व शांतीची गरज
महिलांमध्ये असणारी शक्ती आपण ओळखलेली नाही, त्यामुळे महिलांना देखील समान अधिकार मिळायला हवे, असे म्हणतो. कोणत्याही समाजाचे व्यक्ती, कुटुंब आणि समाज हे घटक असतात. अन्न व पाणी मिळाले की आपण जीवन जगतो, असे नाही. चांगले जीवन जगण्यासाठी भक्ती, शक्ती, सद्भाव, प्रेम आणि शांती गरजेचे आहे, त्यामुळेच समाज सुसंस्कृत होतो.