अनुप जलोटाने केला एक मोठा खुलासा

0

मुंबई : भजन गायक अनुप जलोटा बिग बॉसच्या १२ व्या सिझनमधून घराबाहेर गेले. अनुप जलोटा आणि त्यांची २८ वर्षांची गर्लफ्रेंड जस्लीन मथारू यांच्या अफेअरमुळे ही जोडी बिग बॉसची चांगलीच चर्चित जोडी होती. अनेक नेटकऱ्यांनी या दोघांना सोशल मीडियावर ट्रोलही केले होते. आज अखेर अनुप जलोटा बिग बॉसच्या घराबाहेर गेले आहेत. बिग बॉस स्क्रिप्टेड असतं असा आरोप अनुप जलोटा यांनी घराबाहेर आल्यावर केला. एवढंच नाही तर जस्लीनसोबत माझं नातं बिग बॉसने प्लान केलं होतं असाही आरोप जलोटा यांनी केला आहे.

जस्लीनला या शोची पहिल्यांदा ऑफर देण्यात आली. त्यानंतर जस्लीनने मला फोन केला आणि तुम्ही माझ्यासोबत येणार का? कारण हे जोड्यांचे बिग बॉस आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता का अशी विचारणा केली. मी तिला नाही म्हटले. त्यानंतर तिच्या वडिलांचाही मला फोन आला. केसरी मथारू हे माझे चांगले मित्र आहेत त्यांनीही मला मी बिग बॉसमध्ये जाणार का? असे विचारले होते मात्र मी त्यांनाही नाही सांगितले. पण केसरी मथारू यांनी माझ्याकडे या शोमध्ये सहभागी होण्यासंदर्भात वारंवार विनंती केली. त्यांच्या आग्रहाखातरच मी या शोमध्ये सहभागी झालो. आम्ही गुरु आणि शिष्य बनूनच या शोमध्ये जाऊ असे मी आणि जस्लीनने ठरवले होते. तुम्ही जर गुरु आणि शिष्य म्हणून या शोमध्ये आलात तर हा शो चालणार नाही. त्यामुळे आम्ही सांगतो तेच मान्य करा असे आम्हाला बिग बॉस तर्फे सांगण्यात आले. त्यांनी आम्हाला हेच सांगितले की तुम्ही दोघे रिलेशनशीपमध्ये आहात हे तुम्ही जगाला सांगायचे आहे. त्यामुळे शोला टिआरपी मिळेल. तुम्ही गुरु शिष्य म्हणून या शोमध्ये सहभागी झालात तर तो कोणीही पाहणार नाही. जस्लीनला त्यांनी माझ्याआधीच हे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मलाही हेच सांगितले. त्यामुळे जस्लीनने प्रीमियरच्या वेळी आम्ही रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले.