अनेक ‘अदृश्य हात’ सरकारच्या पाठीशी!

0

मुंबई। राज्यातील आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. तशी परिस्थिती आलीच तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी पुढे येतील, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात कोणताही राजकीय भूकंप होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अदृश्य हात असल्याचा गौप्यस्फोट करून शिवसेनेला एकप्रकारे ‘अदृश्य’ इशाराच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. ’एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सरकार पाच वर्षे पूर्ण करेल!
भाजप-शिवसेना युती सरकारमधील कुरबुरी आणि शिवसेनेकडून वारंवार दिल्या जाणार्या राजकीय भूकंपाच्या इशार्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यातील सरकारमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आहेत. काही मुद्द्यांवर आमचे वाद होतात. अंतर्विरोध असतो. पण तो तात्पुरता असतो. आम्ही गुण्यागोविंदाने सरकार चालवत असून, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना आमच्यासोबतच!
फडणवीस म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेला वगळूनही राज्यातून आम्हाला 145 मते मिळाली हे आम्हाला मीडियातूनच कळले. आम्ही तसा विचारही केला नव्हता. शिवसेना आमच्यासोबत आहे हेच वास्तव आहे. त्यामुळे नकारार्थी विचार करण्याची गरज नाही. सरकार पडण्याचीच वेळ आली तर अनेक अदृश्य हात पुढे सरसावतील, याची मला खात्री आहे. अर्थात, तो हात काँग्रेसचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वात जास्त नुकसानभरपाई आम्हीच देतोय
समृद्धी महामार्गावरुन सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना त्यांनी सांगितलं की, ’शेतकर्‍यांची शेती न जाता झाला असा एक प्रोजेक्ट दाखवा. देशात आजपर्यंत देण्यात आलेली नाही इतकी नुकसानभरपाई आम्ही शेतकर्‍यांना देत आहोत. आम्ही शेतकर्‍यावर जबरदस्ती केलेली नाही. अनेकजण आमच्यासोबत आहेत. शेतकर्‍यांशी संवाद केल्यानंतर जमीन मिळवणार आहोत.’ काहींच्या जमिनी नसतानाही शेतकरी नेते म्हणून आंदोलन करत आहेत असा टोलाही त्यांना यावेळी लगावला.