मुंबई । अल्झायमर आणि त्याच्याशी संबंधित आजारामुळे स्मृतिभ्रंश होतो. अशावेळी या रूग्णांची काळजी लहान मुलांसारखी घेतली पाहिजे. ते समाजातीलच एक घटक आहेत त्यांना विसरू नका, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले. अल्झायमर अँड रिलेटेड डीसोर्डर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने जागतिक अल्झायमर दिनाच्या निमित्ताने ’अवेरथॉन 2017’ वरळी सी फेस येथे आयोजित केली होती. त्याचे उदघाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
स्वअनुभवाने या उपक्रमाशी जोडला गेलो
आपला अनुभव कथन करताना आरोग्यमंत्री म्हणाले की, माझ्या आईला देखील स्मृतिभ्रंशाचा आजार जडला होता. तिची 11 वर्ष मी सेवा केली. या आजारामुळे रुग्णांना होणार त्रास आणि नातेवाईकांना घ्यावी लागणारी काळजी मी अनुभवली आहे. त्यामुळे अल्झायमरच्या जाणीवजागृती मोहीमेशी मी जोडला गेलो. अल्झायमरच्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असून त्यासाठी आरोग्य विभाग पुढाकार घेईल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
चळवळ म्हणून जाणीवजागृतीसाठी प्रयत्न
रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना समुपदेशन आणि प्रशिक्षण देण्यासाठी या क्षेत्रात काम करणार्या संस्था जर पुढे आल्या तर त्यांना राज्यातील जी चार मनोरुग्णालये आहेत तेथे आरोग्य विभागामार्फत जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एक चळवळ म्हणून या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी प्रयत्न केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्यावतीने सी फेसवर 3 किमी ची दौड आयोजित करण्यात आली होती. तिला आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. कात्रक, डॉ. राव, अभिनेत्री तितिक्षा तावडे, संघटनेच्या सरचिटणीस विद्या शेनॉय आदी उपस्थित होते.