अश्‍विन, जडेजाने आशा सोडू नये पुनरागमनाची

0

जोहान्सबर्ग । भारतीय संघातील फिरकीपटू जोडी कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी संघात आपले स्थान पक्क केले आहे. त्यामुळेच फिरकीपटू जोडी रविचंद्रन अश्‍विन आणि रवींद्र जाडेजा यांचा पर्याय म्हणून या दोघांना संघात स्थान देण्यात येत आहे. 2019 चा विश्‍वचषक पाहता कर्णधार विराट कोहलीही चहल आणि कुलदीपलाच जास्तीत जास्त संधी देत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता अश्‍विन आणि जाडेजासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मात्र, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या वक्तव्यानंतर अश्‍विन आणि जाडेजाला काहीसा दिलासा मिळू शकतो. या दोघांसाठी विश्‍वचषकाच्या भारतीय संघाचे दरवाजे अजूनही खुले आहेत, असे भरत अरुण यांनी म्हटले आहे. भारताकडे गोलंदाजांची चांगली फळी आहे. त्यामुळे प्रत्येक फॉरमॅटमध्ये रोटेशन पॉलिसीचा वापर केला जात आहे. अश्‍विन आणि जाडेजा एकदिवसीय क्रिकेट संघात सहभागी होण्याच्या शर्यतीत नाहीत, असे नाही. ते अजूनही भारतीय संघात जागा मिळवू शकतात, असे भरत अरुण म्हणाले.

खेळपट्टीनुसार गोलंदाजी करतात
कुलदीप आणि चहल सकारात्मक गोलंदाज आहेत. ते चेंडू फ्लाइट करण्यासाठी कधीही घाबरत नाहीत. शिवाय काहीतरी मिळवण्यासाठी चेंडू जास्त स्पिन करायलाही चाचपडत नाहीत आणि खेळपट्टीच्या परिस्थितीवर जास्त अवलंबून न राहता गोलंदाजी करतात, असे भरत अरुण यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारत सध्या आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये या फिरकीपटू जोडीने शानदार कामगिरी केली आहे. श्रीलंका दौर्‍यानंतर कुलदीप यादव आणि चहलने आतापर्यंत 17 सामन्यांमध्ये 32 विकेट घेतल्या आहेत. या शानदार कामगिरीनंतरही विश्‍वचषकाच्या संघात अजून जागा बाकी असल्याचे गोलंदाजी प्रशिक्षकांचे म्हणणे आहे.