असे कृत्य होऊ नये यासाठी हैदराबादपेक्षा कडक कायदा करू: मुख्यमंत्री ठाकरे

0

मुंबई: हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा आज सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, असा कायदा करू. हैदराबादपेक्षा कडक कायदा करू. नागरिकांनी संयम बाळगा’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच ‘हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य अशीच आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती. उपचारांचीही शर्थ केली. पण काळाने घाला घातलाच. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याची निर्देश देण्यात आले आहेत’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

‘या भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी शक्य तितक्या जलद गतीने प्रयत्न करावेत, यासाठी संबंधित यंत्रणांना गतीमान केले आहे. आरोपीला कठोरातील कठोऱ शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणांना प्रयत्न करावेत असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता- भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाही. स्त्री-सन्मानाच्या आपल्या संस्कृतीची घरा-घरात उजळणी करावी लागेल’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.