अहमदनगरचा झाला आहे यूपी

0

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची टीका

अहमदनगर । शिवसेनेच्या दोन पदाधिकार्‍यांच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर सेनेचे मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नगरमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे. नगरचा यूपी झाला आहे. खरे तर गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांचे हे अपयश आहे, अशी टीकाही रामदास कदम यांनी यावेळी केली. शिवसेनेचे संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर रविवारी दिवसभर नगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे व कोतवाली पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या संगनमताने राष्ट्रवादीची नगरमध्ये गुंडगिरी सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणीही कदम यांनी केली आहे. ‘भाजप आमदार शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप व अरुण जगताप हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. एकीकडे युती असल्याचे दाखवायचे व दुसरीकडे शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचे भाजपचे धंदे आम्हाला नवीन नाहीत,’ असा आरोपही रामदास कदम यांनी केला.
शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी व्हावी, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार्‍यांवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. दोन्ही मृत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना घेणार, असेही त्यांनी जाहीर केले. या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.

आरोपींना पोलीस कोठडी
दरम्यान, हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास कोतकर या चौघांना 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी अटकेत असलेल्या 22 जणांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाजपा आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक
अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान शनिवारी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. कर्डिले हे आमदार जगताप यांचे सासरे आहेत.

नगर बनतेय का राजकीय गुन्हेगारीचा अड्डा?
अहमदनगर राजकीय गुन्हेगारीचा अड्डा बनत आहे का? असा सवाल सर्वसामान्यांकडून केला जात आहे. अहमदनगरमध्ये सेनेच्या 2 कार्यकर्त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. अहमदनगरमध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ लागलं आहे का? केडगाव येथील पोटनिवडणुकीत खून होतो. का आहे केडगाव इतके प्रतिष्ठेचे?

अहमदनगरमधील केडगावच्या सुवर्णनगर भागात शनिवारी सांयकाळी सेनेच्या दोन पदाधिकार्‍यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. कोतकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या तर ठुबे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. महापालिकेच्या एका जागेसाठी केडगावला झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. ही पार्श्‍वभूमी या हत्येमागे आहे का? याविषयी चर्चा होत आहे.