जळगाव : आंतरजातीय विवाह करणार्या दाम्पत्याला ग्रामस्थांसह मुलीच्या कुटुंबियांकडून मारहाण करून त्रास दिला जात असल्याचा प्रकार पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथे घडला. या प्रकरणी पीडीतांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली आहे.
गाव न सोडल्यास जीवे मारण्याची धमकी
पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथील तरुण-तरुणीने गत 15 ऑगस्ट रोजी आंतरजातीय विवाह केला असून त्यानंतर ते पारोळा पोलिसात हजर झाले. या ठिकाणी पोलिसांनी मुलगा व मुलगी दोघांकडील आई वडीलांना बोलाविले. मुलगी सज्ञान असल्याने तिने पतीसोबत राहण्याचे सांगितल्यावर कायदेशीररित्या नोंदही करण्यात आली मात्र आता मुलगी परत द्या, म्हणत मुलीचे वडील तसेच नातेवाईक मुलाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करत छळ करत आहे. गावात राहायचे नाही म्हणत गाव सोडले नाही तर जीवे मारण्याची धमकीही मुलीच्या कुटुंबियांकडून दिली जात आहे. दोघांनी एकमेकांच्या संमतीने कायदेशीररीत्या हा विवाह केला असून आम्हाला न्याय मिळावा मिळावी, अशी मागणी दाम्पत्याने केली आहे. याबाबत पारोळा पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तरुणाने केला आहे. कारवाईच्या मागणीसाठी दाम्पत्याने पोलिस अधीक्षकांना निवेदन देत तक्रार केली आहे.