तातडीने दुरूस्त करण्याची मागणी
वडगाव मावळ : आंदर मावळातील इंद्रायणी नदीवर उभारलेल्या पुलाचे रेलिंग तुटले असून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. रेलिंग नसल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. भरीस भर म्हणजे या तुटलेल्या रेलिंगच्या ठिकाणी लाल कापड बांधण्यात आले आहे. प्रत्येक पुलाला रेलिंग असणे आवश्यक आहे. रेलिंगमुळे वाहन चालकांना पुलाचा अंदाज येतो. त्यामुळे प्रवास सुरक्षित होतो. रात्री अपरात्री प्रवास करताना हे लाल कापड दिसून येत नाही. त्यामुळे उद्या एखादी दुर्घटना घडण्याचा संभव नाकारता येत नाही. मात्र दुर्घटना घडल्यानंतरच ही दुरूस्ती करणार आहेत का, असा संतप्त सवाल आसपासच्या गावांमधील ग्रामस्थ करीत आहेत.
सुमारे 45 गावांना जोडणारा पुल
रेलिंग तुटल्यास तातडीने दुरुस्त करून तिथे नवीन लोखंडी रेलिंग बसवणे बंधनकारक असते. मात्र आंदर मावळातील इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या अत्यंत रहदारीच्या पुलावरील रेलिंग तुटून अनेक दिवस उलटले आहेत. हे रेलिंग दुरुस्त करण्याऐवजी त्याठिकाणी लाल कापड बांधण्यात आले आहे. इंद्रायणी नदीवरील पूल आंदर मावळातील सुमारे 45 गावांना जोडतो. हजारो वाहने या रस्त्याने ये-जा करतात. मागील आठवड्यात एका वाहनाच्या धडकेत या पुलावरील रेलिंग तुटले आहे. प्रशासनाने हे तुटलेले रेलिंग तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाने रेलिंग चक्क कापडाने बांधून प्रवाशांची सुरक्षा बांधून टाकली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुलावरील आणि आसपासच्या काही अंतरावरील रस्ता खड्डेयुक्त झाला आहे. नदीवरील पूल आणि परिसराला निसर्गाची अनोखी देणगी लाभली आहे. त्यामुळे या पुलाला आणि परिसराला पाहण्यासाठी पर्यटक देखील इथे येत असतात. या रस्त्याच्या दुरुस्तीची तसेच रस्त्यावर पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.