धर्माबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात महाराष्ट्रातील न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. चंद्राबाबू नायडूं यांच्यासह अन्य १५ जणांविरुद्ध हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बाभळी प्रकल्पाविरुद्ध 2010 मध्ये गोदावरी नदीवरील आंदोलन केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट जारी केले आहे. धर्माबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.आर. गजभिये यांनी या प्रकरणात नायडू यांच्यासह सर्वांना अटक करून २१ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये विरोधक असतांना चंद्राबाबू नायडू यांनी 2010 मध्ये त्यांनी बाभळी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी नायडू यांना अटक करून पुण्यातील तुरुंगात ठेवले होते. परंतू त्यानंतर त्यांनी जामीन नाकारला होता. पण नंतर नायडूंची सूटका करण्यात आली होती. या प्रकरणात नायडू यांच्यावर सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, धोकादायक शस्त्राद्वारे इजा पोहचवणे, धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात न्यायालयाने 5 जुलै रोजी आदेश दिला होता की, 16 ऑगस्टपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्यानंतर मात्र त्यात दुरुस्ती करून ही तारीख २१ सप्टेंबर करण्यात आली. नायडू यांच्यासह तेथील जलसंपदा मंत्री देवीनेनी उम्मामेश्वरा राव आणि समाजकल्याण मंत्री एन. आनंद बाबू, माजी आमदार जी. कमलाकर यांचाही समावेश आहे.