पुणे । महाभारत, रामायणाचे संस्कार करुनच शिवरायांसारखा शिवसूर्य जन्माला येतो. आज शिवचरित्राची जितकी आवश्यकता आहे, तितकी आवश्यकता यापूर्वी कधीच नव्हती. जिजाऊंनी जे संस्कार केले त्यामुळेच शिवराय घडले. शिवरायांना समजून घेण्यासाठी आधी जिजाऊंसारख्या मातेला समजून घ्यायला हवे. आपल्यामध्ये शिवज्योत आहेच, पण आपण ती विझवत आहोत. प्रत्येकाने ज्योतीने ज्योत पेटवायला हवी. शिवरायांचा लढा हा जिहादी आतंकवाद्यांविरूध्द आणि हिंदू धर्माच्या रक्षणाकरीता होता. शिवरायांचे चरित्र हे सर्व प्रश्न सोडविणारे असून ते समजून घेण्याची सर्वाधिक गरज आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्यात्या गीता उपासनी यांनी केले.
संपूर्ण भारतभूमी तीर्थक्षेत्र
गीता उपासनी म्हणाल्या, देव धर्माची होणारी विंटबना ही महाराजांना पटणारी नव्हती. ती थांबविण्यासाठी आणि अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा यज्ञ केला. संपूर्ण भारतभूमी ही त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्र होती. तीर्थक्षेत्रे मुक्त व्हावीत, हे त्यांचे ध्येय शेवटच्या क्षणापर्यंत होते आणि त्यासाठी ते लढत राहिले. जिथे हिंदू धर्म एकवटतो ती तीर्थक्षेत्र आहेत. हिंदूधर्माचे हे विचार पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याची आज गरज आहे, असे ही त्यांनी सांगितले. प्रिती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
मातृगौरवाच्या मानकरी
लाल महाल येथे समस्त हिंदू आघाडी, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, लालमहाल उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पौष पौर्णिमा व राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त मातृगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. प्रा. संगीता मावळे, प्रिती शिंदे, चारुलता काळे, सारीका वारुळे, दिपाली गिते, उषा फडतरे, दिपाली झेंडे, अॅड. मोहन डोंगरे, शाहीर हेमंतराजे मावळे, नंदू एकबोटे आदी यावेळी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी बबई फडतरे, शकुंतला देशमाने, विजया कुलकर्णी, गीता हेंद्रे, चंद्रभागा काळे या मातांना मातृगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.