मुंबई – केंद्र व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या म्हणजेच गुरूवारपासून राज्यभर शिवार संवाद सभा घेण्यात येणार आहे.
२५ ते २८ मे अशा चार दिवस प्रत्येक गावात या शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिलला भाजपा प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा समारोप करताना पिंपरी चिंचवड येथे शेतकरी संवाद सभांच्या उपक्रमाची घोषणा केली होती. राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे या सभांचे नियोजन करीत आहेत. पहिल्या दिवशी म्हणजेच गुरूवारी, एकाच दिवशी चार हजार गावांमध्ये सकाळी दोन व सायंकाळी दोन अशा चार हजार सभा होणार आहेत. हा उपक्रम रविवार, २८ मे रोजी पूर्ण होईल. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपाचे लोकप्रतिनिधी संवाद करतील.पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद करतील. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे व बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची पूर्ण माहिती व्हावी तसेच वंचित शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा म्हणून भाजपातर्फे ही संवाद मोहीम होत आहे. या उपक्रमामध्ये भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत.