आज भेंडवळच्या घटमांडणीचे भाकित

0

बळीराजाचे लक्ष लागले
पाऊस, दुष्काळ, राजकारणाचे अडाखे
जळगाव : बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी 18 एप्रिलरोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सूर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराजांनी केली. 19 एप्रिलच्या पहाटे घटामध्ये झालेल्या बदलाचे अवलोकन करून यंदाच्या घटमांडणीची भविष्यवाणी कथन केले जाणार आहे. या भाकीताकडे राज्यभरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर घटमांडणी
300 वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना भेंडवळमधील वाघवंशाचे पूर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली. आणि ती परंपरा या वाघ कुटुंबीयांनी आजही जपली आहे. अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व सहकार्‍यांनी चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटमांडणी केली. या घटमांडणीनंतर रात्रभर त्या परिसरात कुणीही फिरकत नाही. अशा परिस्थितीत रात्रीच्या समयी घटामध्ये नैसर्गिकरित्या जो काही बदल घडून येतात त्याबाबत दुसर्‍या दिवशी उपस्थित हजारो शेतकर्‍यांच्या समक्ष येणार्‍या हंगामाचे पिकपाण्याचे तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहुल देणारे भाकीत वर्तविण्यात येते. गुरूवारी याबाबत कथन करण्यात येणार असून, राज्यातील बळीराजाचे याकडे लक्ष लागले आहे.