मुंबई – राज्यातील शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अमृत व नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या दोन्ही अभियानांच्या माध्यमातून राज्यातील 28 शहरांमध्ये 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपुजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता वर्षा निवासस्थानी होणार आहे. एकाचवेळी 28 विविध प्रकल्पांचा ई-भूमिपुजन समारंभ होण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी दिली.
वाढते नागरीकरण ही समस्या न मानता संधी मानून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने धोरणे आखण्यात येत आहेत. नागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा, मलनि:स्सारण व सांडपाण्याचा पुनर्वापर, हरितपट्टे या मुलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
अमृत अभियानातंर्गत अंबरनाथ पाणी पुरवठा योजना 13.63 कोटी, कुळगाव बदलापूर पाणीपुरवठा योजना 17.77 कोटी, नाशिक मलनिस्सारण योजना 28.79 कोटी, हिंगणघाट पाणीपुरवठा योजना 61.59, इचजकरंजी पाणी पुरवठा योजना 68.68 कोटी, अकोला पाणी पुरवठा योजना 110.82 कोटी, जळगाव पाणी पुरवठा योजना 249.16 कोटी तर यवतमाळ पाणी पुरवठा योजना फेज-1 व 2 साठी 276.28 कोटी असे 8 शहरांमधील एकूण 826.72 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे ई-भूमिपुजन होणार आहे.
नगरोत्थान अभियानातंर्गत चिखलदरा पाणी पुरवठा योजना 3.81 कोटी, रोहा नदी सौंदर्यीकरण 6.30 कोटी, मानवत पाणी पुरवठा 8.62 कोटी, सेनगाव पाणी पुरवठा 12.87 कोटी, देवळाली प्रवरा पाणी पुरवठा 15.25 कोटी, दोंडाईचा वरवाडे पाणी पुरवठा 20.91 कोटी, सिंदखेडा पाणी पुरवठा 21 कोटी, मालेगांव उड्डाणपूल 21.72 कोटी, राहता भुयारी गटार योजना 24.81 कोटी, रोहा भुयारी गटार योजना 28.81 कोटी, लोणावळा पाणी पुरवठा 33.49 कोटी, अहमदपूर पाणी पुरवठा 44.52 कोटी, पाचोरा भुयारी गटार योजना 56.96 कोटी, जयसिंगपूर भुयारी गटार योजना 58.96 कोटी, चांदवड पाणी पुरवठा 64.05 कोटी, जामनेर भुयारी गटार योजना 66.54 कोटी, इस्लामपूर भुयारी गटार योजना 69.42 कोटी, हिंगोली भुयारी गटार योजना 69.43 कोटी, फलटण भुयारी गटार योजना 72.70 कोटी, गडचिरोली भुयारी गटार योजना 94.37 कोटी असे 20 शहरांमधील एकूण 794.54 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपुजन समारंभ एकाचवेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील शहरांमधील नागरिकांना अनेक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे.
वेळ व पैसा वाचवणारा योग्य निर्णय
या ई-भूमिपूजन समारंभास त्या त्या शहरांच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे त्या त्या शहरांमध्ये वेब कास्टद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दरम्यान हा निर्णय वेळ व पैसा वाचवणारा अत्यंत योग्य आहे. मुख्यमंत्र्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊन कार्यक्रमाला उपस्थित राहतांना खर्ची होणारा वेळ, त्यासाठी लागणारे अतिरीक्त मणुष्यबळ तसेच त्यासाठी लागणारा पैसा इत्यादी सर्व गोष्टी होणारा अपव्यय या ई-भूमीपूजन संकल्पनेमुळे टळणार आहे.