आधार जोडणीची मुदत 31 मार्चपर्यंत

0

मोबाईल क्रमांकसाठी अंतिम तारीख 6 फेब्रुवारीच

नवी दिल्ली : विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जोडणीची मुदत पुढीलवर्षी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे. आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारने ही माहिती दिली. आधार कार्ड जोडणीची मुदत वाढवण्यासंबंधी शुक्रवारी केंद्र सरकारतर्फे अधिसूचना काढण्यात येईल. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक केले होते. सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे.

आधार कार्डला स्थगिती नाही
या याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली. केंद्र सरकारच्यावतीने अ‍ॅटर्नी जनरल केके वेणूगोपाळ यांनी सांगितले की, आधार कार्डला स्थगिती देता येणार नाही. आम्ही याबाबत आमची बाजू मांडायला तयार आहोत. मात्र, मोबाईल क्रमांक आणि आधार जोडणीची अंतिम 6 फेब्रुवारीच असेल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.

पुढील आठवड्यात सुनावणी
आधार कार्डमुळे गोपनीयतेचा भंग होत असून, आधार सक्तीला स्थगितीबाबत तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होईल. सध्या केंद्र सरकारच्या 131 कल्याणकारी योजनांना आधारशी जोडण्यात आले आहे.