आपत्ती काळातील रक्षण विषयावर कार्यशाळा

0

नवी मुंबई । आपत्ती काळात आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहणे महत्त्वाचे असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने यूएनडीपीच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गातून प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी आपले ज्ञान इतरांनाही देतील आणि नवी मुंबई शहराच्या सुरक्षिततेला बळ देतील असा विश्‍वास नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात यूएनडीपी, निमहान्स व यूएसएआयडी संस्थांच्या सहयोगाने आयोजित ‘आपत्कालीन परिस्थितीतील मानसिक सुरक्षा’ या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करत होते.

प्रशिक्षण अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्‍वास
निमहान्सचे सहा. प्राध्यापक डॉ. जयकुमार सी. यांनी आपल्या मनोगतात आपत्ती काळात महत्त्वाच्या असलेल्या मानसिक स्वास्थ्य रक्षणाच्या आवश्यकतेकडे या आधी मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले असून यापुढील काळात याविषयाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत या तीन दिवसीय प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतातील सहा शहरांमध्ये आपत्ती व हवामान बदलविषयक राबवण्यात येणार्‍या सहा शहरांमध्ये नवी मुंबई एक शहर असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात आपत्तीचे विविध प्रकार लक्षात घेऊन समग्र आपत्ती व्यवस्थापन प्रणाली राबवण्याची गरज विशद करत सन-2012 पासून नवी मुंबई महानगरपालिका यूएनडीपी सोबत आपत्ती व्यवस्थापविषयक प्रकल्प राबवत असल्याची माहिती दिली. महानगरपालिका यूएनडीपी, निमहान्स व यूएसएआयडी या संस्थांच्या एकत्रित सहयोगाने मानसिक स्वास्थ्य रक्षण आणि आपत्ती जोखमीचे प्रमाण कमी करण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असून या प्रशिक्षण अत्यंत उपयोगी ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे मनोबल राखणे महत्त्वाचे
याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, यूएसएआयडीचे दक्षिण आशियाई वरिष्ठ क्षेत्रीय सल्लागार मायकेल अर्नस्ट, कार्यक्रम व्यवस्थापक बलाका डे आणि राष्ट्रीय कार्यक्रम समन्वयक मनीष मोहनदास, निमहान्सचे सहा. प्राध्यापक डॉ. जयकुमार सी. व राज्य प्रकल्प समन्वयक नुपूर सिंग, सहा. आयुक्त दिवाकर समेळ आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याप्रसंगी बोलताना कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे आपत्तीच्या दृष्टीने जोखमीचे क्षेत्र असलेली नवी मुंबई महानगरपालिका आपले वेगळेपण जपत आपत्तीच्या दृष्टीने सजग आहे अशी माहिती दिली. त्याकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात असून कोणत्याही आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी मानसिक स्वास्थ्य चांगले असणे अतिशय गरजेचे आहे, त्यामुळे आपत्ती काळात मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे व मनोबल राखणे महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. यासाठी नवी मुंबईची निवड केल्याबद्द्ल त्यांनी यूएनडीपी आणि यूएसआयडी यांचे तसेच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाबद्दल निमहान्सचे आभार मानले.उत्तराखंड येथे 2013 मध्ये झालेल्या आपत्ती प्रसंगानंतर मानसिक सुरक्षेची गरज भासू लागली आणि यूएस गर्व्हमेंटने अशा प्रकारे जागतिक स्तरावर आपत्तीविषयक इतर देशांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली, असे सांगत यूएसएआयडीचे दक्षिण आशियाई वरिष्ठ क्षेत्रीय सल्लागार मायकेल अर्नस्ट यांनी भारत सरकारसोबत यूएसएआयडी या दृष्टीने कार्य करीत असल्याची माहिती दिली.