आमदार लांडगे यांनी पुणे पालिकेतील अधिकार्‍यांना घेतले फैलावर

0

पावसाळ्यापुर्वी काम पूर्ण करण्याची दिली तंबी

पिंपरी : तुमच्या ढिसाळ नियोजनामुळे विनाकारण चर्‍होलीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात यावे, अशी तंबी त्यांनी दिली. तसेच आपल्याला काम करणे जमत नसेल तर ते करु नका, असे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिकार्‍यांना सुनावले आहे. भामा-आसखेड धरणातून पुण्यासाठी नेल्या जाणार्‍या पाणसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून पाईपलाईन टाकण्याचे काम संथगतीने सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून चर्‍होली परिसरात हे काम रेंगाळले आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन आमदार महेश लांडगे यांनी पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले.

दोन वर्षांपासून काम संथगतीने
राज्य सरकारने पुणे महापालिकेला भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यास परवानगी दिली आहे. त्याकरिता वाघोली येथे जलशुद्धीकरण बांधण्याचे पुणे महापालिकेचे नियोजन आहे. ही पाईपलाईन टाकण्याचे काम खेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, आळंदी नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमधून केले जात आहे. यापैकी पुणे-आळंदी रस्त्यावरील पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चर्‍होलीगावच्या हद्दीत हे काम सुरु आहे. मात्र, गेली दोन वर्षांपासून हे काम संथगतीने सुरु आहे. रस्ता खोदल्याने अनके अपघात झाले आहेत. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी गुरुवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला ‘इ’ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, पिंपरी पालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, पुणे पालिकेचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम, पिंपरी पालिकेचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड, नगरसेवक राहुल जाधव तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

अधिकार्‍यांचे कामाकडे लक्ष नाही
आमदार महेश लांडगे म्हणाले की, या कामासाठी अनेक ठिकाणच्या जागांचा ताबा पुणे महापालिकेकडे नाही. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने या कामासाठी जागा उपलब्ध करुन दिली असतानादेखील हे काम गेल्या दोन महिन्यापासून अत्यंत संथ गतीने सुरु आहे. पुणे महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी याकामाकडे फिरकत देखील नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून या कामात दिरंगाई होत आहे

पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे काम संथगतीने सुरु आहे. संथगतीने सुरु असलेल्या खोदकामाचा चर्‍होलीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. ठेकेदाराने जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. सदर रस्त्यावर वारंवार अपघात होतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे. काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न केल्यास कारवाई करण्यात यावी, अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.