आयपीएलने मुळ क्रिकेटची वाट लावली – मायकल अथर्टन

0
नवी दिल्ली – भारतासह जगभरातील क्रीडारसिकांच्या मनात आतापर्यंतच्या ११ हंगामानंतर आयपीएलने जागा केली आहे.
आयपीएलने भारतामधील अनेक तरुण खेळाडूंना असंख्य संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.पण आयपीएलने क्रिकेटच्या मुळ स्वरुपाची वाट लावली असल्याचे मत इंग्लंडचे माजी खेळाडू मायकल अथर्टन यांनी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या पुस्तक प्रकाशनादरम्यान व्यक्त केले आहे.
इतर गोष्टींप्रमाणे क्रिकेटही उध्वस्त झाले असून आयपीएलने प्रत्येक खेळाडूंना विविध पर्याय उपलब्ध करुन देत क्रिकेटची पूर्णपणे वाट लावली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अथर्टन यांना टी-२० क्रिकेटच्या तुलनेत कसोटी क्रिकेटच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला असताना त्यांनी आपले मत मांडले आहे. इंग्लंडचे माजी खेळाडू माईक गॅटींग आणि श्रीलंकेचा  माजी यष्टीरक्षक कुमार संगकारा हे देखील या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.
कसोटी क्रिकेटला इंग्लंडमध्ये अजुनही भवितव्य आहे. तुम्हाला भारतात कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांची उपस्थिती कदाचीत लाभणार नाही.
पण आतापर्यंत कसोटी क्रिकेटने प्रत्येक वेळा नवीन बदल आत्मसात केले असल्यामुळे मी भविष्यकाळासाठी सकारात्मक असे म्हणत अथर्टन यांनी आपली बाजू मांडली.
 कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी दिवस-रात्र कसोटी सामने हा पर्याय ठरु शकतो का असा प्रश्न विचारला असता, प्रत्येक काम करणाऱ्या माणसाला आपला वेळ दिवस-रात्र कसोटी सामना पाहण्यासाठी देता येईल याची खात्री देता येत नसल्याचे अथर्टन म्हणाले.