गुवाहाटी । ईशान्य भारतात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. आसाम, मणिपूर आणि मिझोरमसह त्रिपुरा येथील अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याचे आणि भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. या घटनांमध्ये मंगळवारपर्यंत जवळपास 10 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, मिझोरमच्या नदीत 10 जण वाहून गेल्याची माहिती मिळते आहे. तिथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे तसेच बेपत्ता झालेल्यांना शोधून काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत.
डोंगराळ भागात दुर्घटना
मिझोरमच्या करनाफुलू नदीवर ढगफुटीने अचानक पूर आले. या पुरात 10 जण वाहून गेले असून त्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे. बचाव पथकाने बुधवारी त्यापैकीच एकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. डोंगराळ भागांमध्ये अनेक दुर्घटना या ढगफुटीने घडल्या आहेत असे प्रशासनाने म्हटले आहे. यात मिझोरममध्ये 400 घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सततचा मुसळधार पाऊस आणि ढगफुटी यामुळे मिझोरम-आसाम या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 54 लासुद्धा मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे इथल्या अनेक शहरांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.