शहादा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले.त्यामध्येच शेतमाल विक्रीची एकमेव बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा बंद पडली. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी उद्या १५पासून सोशल डिस्टनसिंगच्या प्रायोगिक तत्त्वावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे दरवाजे उघडणार असल्याची माहिती सचिव संजय चौधरी यांनी दिली.
कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सध्या रब्बी हंगामातील गहू, दादर, हरभरे आदी शेतकऱ्यांनी पिकविलेला माल सध्या घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण मंदावले आहे. कोरोणामुळे लावलेल्या संचार बंदीच्या थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे .शेतात पिकवलेला शेतमाल घेऊन जायचा कसा आणि विकायचा कुठं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. बाजार समिती ही बंद असल्याने शेतमाल विक्री करण्याची सुविधा उरलेली नव्हती.त्यावर तोडगा काढत
शासनाच्या आदेशानुसार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत.त्यानुसार उद्या( ता.१५) सुरुवातीला ५० शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीच्या याद्या कृषी विभागाने तयार केल्या आहेत.त्या याद्या कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाल्या असून बाजार समितीने त्या पन्नास शेतकऱ्यांना भ्रमणध्वनी करून आपला माल विक्रीस आणावा असे कळविले आहे .शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोशल डिस्टनसिंग, गर्दी वगैरे बाबी तसेच शासनाने निर्गमित केलेले सर्व आदेश यांची काळजी घेऊन व्यवहार सुरू करण्यात येणार आहे.
” शासनाच्या निर्देशानुसार सर्व नियमांची काळजी घेऊन कृषी विभागाकडे नोंदणी केलेल्या पन्नास शेतकऱ्यांचा शेतात उत्पादित केलेला माल सोशल डिस्टनसिंग, गर्दी होणार नाही हमाल वर्गाची कॅपॅसिटी पाहून सुरुवातीला पन्नास वाहने म्हणजेच १५०० क्विंटल माल घेऊ तदनंतर यात वाढ करायची की नाही ते परिस्थिती पाहून ठरवण्यात येईल”.( संजय चौधरी, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा)