ऊसदराबाबत तोडगा निघाला!

0

कोल्हापूर : ऊस दरासंदर्भात कोल्हापूर येथे रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आले आहे. बैठकीत प्रतिटन उचलीला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्‍नावरुन आक्रमक झाली होती. स्वाभामानी संघटनेच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

तोडग्याला कारखानदार, स्वाभिमानीची संमती
ऊस दरासंबंधी कोल्हापूरमध्ये खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि साखर कारखानदारांमध्ये बैठक झाली. या बैठकीत प्रतिटन पहिल्या उचलीबरोबर 100 रुपये आणि दोन महिन्यांनतर 100 रुपये असे एकूण 200 रुपये वाढीव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या एफआरपी दराला कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही संमती दर्शविली आहे.

3500 रूपयांची मागणी
ऊसाला टनामागे 3 हजार 500 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकरी संघटना करत होत्या. ही मागणी व्यवहार्य नसल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले होते. एफआरपीचे पैसे सुलभतेने मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, ही प्रक्रिया ऑनलाईन केली जाईल, वजनकाटे नियंत्रणात ठेवण्यासाठी वजनकाटे समिती गठीत केली जाईल असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले होते.

सदाभाऊ खोत यांनी आश्‍वासन पाळले
रघुनाथ पाटलांनी ऊस दरावरून भाजप सरकार लक्ष्य केले होते. गुजरात आणि इतर राज्यात एकाच पक्षाचे राज्य असलेल्या ठिकाणी एफआरपीला चांगला भाव मिळतो. महाराष्ट्रात मात्र एफआरपी कमी सांगितली जाते. आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकर्‍यांना आत्महत्या करायला लावू नका, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी दिला होता. दरम्यान, सरकार शेतकर्‍यांच्याच बाजूने काम करत असून त्यांना ऊसाला क्विंटलमागे 3400 ते 3500 रुपयांचा देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्‍वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले होते.