पुणे- राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका चौक ते साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्याची एफआरपी प्रश्नावर फसवणूक केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी वेळ पडल्यास राज्याची तिजोरीही खाली करू अशी घोषणा केली होती. त्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही आता शोध घेत आहोत, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
खासदार शेट्टी यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही जोरदार टीका केली. सहकार मंत्री भामटा आणि चोर असून या चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत, अशा शब्दात त्यांनी सहकार मंत्र्यांचाही खरपूस समाचार घेतला.
या मोर्चात स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव हे देखील उपस्थित होते, तसेच राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.