ऑनलाईनचा मधला दलाल सरकारने जन्माला घातला – आमदार अमरसिंह पंडीत

0
नागपूर  – शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली नाही पण व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली गेली. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने सर्व यंत्रणा ऑनलाइन केली त्यामुळे ऑनलाइनवर लोकांनी धंदा सुरू केला आणि तूर ऑनलाइन विकण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसा काढला गेला. याबाबत शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी सरकारची असताना सरकारने मदत केली नाही. उलट ऑनलाईनचा हा मधला दलाल जन्माला घातला असा आरोप आमदार अमरसिंह पंडीत यांनी केला.
विधानपरिषदेमध्ये नियम २६० च्या प्रस्तावावर बोलताना आमदार अमरसिंह पंडीत यांनी सरकारच्या शेतीच्या वेगवेगळया धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. बीड जिल्ह्यात पीकविमाची यादीच लावली गेली नाही. बँका शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक पीकविम्याची मदत मिळाली बाब भूषणावह नाही. हे सरकारचे अपयश आहे. सिंचन नीट झाले नाही. सरकारचे योग्य नियोजन झाले नाही म्हणून शेतकऱ्यांना मदतीची गरज पडत आहे असेही आमदार अमरसिंह पंडीत म्हणाले.
दरम्यान पेरणीचे दिवस संपत आले पण अद्यापही पीकविमा वितरीत केला गेला नाही. २७ हजार शेतकऱ्यांनी प्रिमियम भरले पण मदत मिळाली नाही. पिकविमा संदर्भात शेतकऱ्यांना दाद मागता येत नाही याची चौकशी करण्याची मागणीही आमदार अमरसिंह पंडीत यांनी केली.
बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे परिवार उध्वस्त झाले. सरकारने याच सभागृहात मदतीची घोषणा केली मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. या संदर्भातला खुलासा व्हायला हवा. शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली त्याबद्दल शेतकऱ्यांची सरकारने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.
बीटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना बोंडअळीचा सामना करावा लागला. एकाही बियाणे कंपनीविरोधात सरकारने गुन्हा दाखल केला नाही. सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. सरकारला २०१९ मध्ये ही चेष्टा महागात पडेल असा इशारा आमदार अमरसिंह पंडीत यांनी सरकारला दिला.
सरकारने या हंगामासाठी बीटी बियाणे वितरीत केले आहे. सरकारने बियाणे वितरीत करताना हे बियाणे चांगले असल्याची घोषणा करायला हवी होती. पण सरकारने तसं केलं नाही. या हंगामात शेतकऱ्यांना पीक चांगले आले तर हरकत नाही पण जर पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव कापसाच्या पीकावर पडला तर शेतकऱ्यांचा कोप सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही आमदार अमरसिंह पंडीत यांनी दिला.
कापसाच्या पिकांसंदर्भात शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल तीन लाखांचे नुकसान झाले. सरकारने व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या संसाराची जी राखरांगोळी झाली आहे त्याला जबाबदार हे सरकारमधले लोक आहेत असा आरोपही अमरसिंह पंडीत यांनी केला.
शिवसेनेतले लोकही याला तितकेच जबाबदार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून निर्णय घेतात आणि तिकडे गावाकडे सरकारविरोधात बोंब ठोकतात अशा शब्दात आमदार अमरसिंह पंडीत यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.