नवी दिल्ली । अनेक महिन्यांपासून काश्मीरमध्ये तरुणांची आंदोलने सुरु आहेत. जवानांवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महिला आंदोलनकर्त्यांकडूनही जवानांवर दगडफेक केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर ऑल वूमन इंडिया रिझर्व्ह बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे. ऑल वूमन इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या 1 हजार कर्मचारी काश्मीरमध्ये तैनात असणार आहेत. या महिला कर्मचारी राज्य पोलिसांना दगडफेकीच्यावेळी सहाय्य करतील.
खर्चाची जबाबदारी केंद्र सरकारची
काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक घेतली. या बैठकीत ऑल वूमन इंडिया रिझर्व्ह बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑल वूमन इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या स्थापनेला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ‘बटालियनमधील महिला कर्मचारी काश्मीर पोलिसांना मदत करतील. त्यांच्यावरील खर्चाची जबाबदारी केंद्र सरकारची असेल,’ असे गृह मंत्रालयातील एका अधिकार्याने सांगितलेे.
5 हजार जागांसाठी ‘महिलांचे 6 हजार अर्ज
ऑल वूमन इंडिया रिझर्व्हअंतर्गत पाच बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे. 5 हजार जागांसाठी काश्मीरमधील 1 लाख 40 हजार अर्ज आले आहेत. ‘महिलांचे 6 हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे महिला कर्मचारी बटालियनची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा दलातील महिला कर्मचार्यांचे प्रमाण पुढे 33 टक्क्यांपर्यंत नेण्याचा मानस आहे,’ अशी माहिती या अधिकार्याने दिली.