नागपूरः महाविकास आघाडीच्या सरकारकडून कर्जमाफीची घोषणा कधी होईल? याबाबत संपूर्ण राज्याकडून प्रश्न विचारला जातो आहे. याबाबत अर्थमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्जमाफी करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, योग्य वेळी हा निर्णय जाहीर होईल असे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक संपन्न झाली, त्यानंतर जयंत पाटील माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. बैठकीत शेतकरी कर्जमाफीवर चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्याबचा अधिकार आहे. विरोधक आक्रमक कुठे आहेत? ते फक्त कांगावा करत आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर नवीन सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली सुरू झाल्या असून, सहकार विभागाकडून यासाठी माहिती मागविण्यात येत आहे. यामध्ये कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात, थकबाकीदार शेतक-यांची संख्या व इतर माहितीचा समावेश असून, त्यासाठी सहकार विभागाकडून ही माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू झाले.