सिडनी – पावसाने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलिया संघावर पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर गुंडाळला. तसेच पहिल्या डावात ३२२ धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलो ऑन दिले आहे.
पावसाच्या व्यत्ययानंतर खेळास सुरुवात झाल्यावर मोहम्मद शमीने पॅट कमिन्सची (२५) विकेट घेत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराने पीटर हँडस्कोंबला (३७) माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. पाठोपाठ कुलदीप यादवने नाथन लायनची विकेट काढत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. मात्र मिचेल स्टार्क ( नाबाद २९) आणि जोस हेझलवूड (२१) यांनी शेवटच्या विकेटसाठी चिवट फलंदाजी करत संघाला ३०० पार मजल मारून दिली. अखेरीस कुलदीप यादवने हेझलवूडची विकेट काढून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. भारताकडून कुलदीप यादवने ५, जडेजा आणि शमीने प्रत्येकी दोन तर बुमराने एक गडी बाद केला.