सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची कोंडी
अलिगड : काँग्रेसच्या हाताला मुस्लिमांचे रक्त लागले आहे आणि लोकांनी आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केले आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठात एका माजी विद्यार्थ्याने काँग्रेसच्या कार्यकाळात घडलेल्या बाबरी मशीद आणि इतर जातीय दंगलींबद्दल प्रश्न विचारला असता सलमान खुर्शीद यांनी हे वक्तव्य केले. सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यानंतर भाजपाने काँग्रेसला घेरण्यास सुरु केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात जवळपास पाच हजार दंगली घडल्याचा आरोप केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला आहे.
तुमच्या हाताला ते लागू नये
एएमयूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सलमान खुर्शीद यांना एका विद्यार्थ्याने काँग्रेसच्या कार्यकाळात मुस्लिमांवर अन्याय झाला असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आमीर या विद्यार्थ्याने 1984 शीखविरोधी दंगल आणि 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीचा प्रामुख्याने उल्लेख केला होता. यावर बोलताना सलमान खुर्शीद यांनी, मी काँग्रेसचा भाग आहे आणि आमच्या हाताला मुस्लिमांचे रक्त लागले आहे हे मान्य केले पाहिजे. आम्ही आमच्या हाताला लागलेले रक्त तुम्हाला दाखवण्यास तयार आहोत, जेणेकरुन ते आपल्या हाताला लागू नये हे तुम्हाला कळावे, असे म्हटले.
खुर्शीद काँग्रेसवर नाराज
सलमान खुर्शीद सध्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेसने सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर केल्याने त्यामनी नाराजी व्यक्त केली होती. महाभियोग ही अत्यंत गंभीर बाब असून एखाद्या निर्णयावर नाराज असल्याने त्याचा वापर करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यावर भाजपाने हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात पाच हजार दंगली झाल्या आहेत. आणि आता जर ते त्यासाठी माफी मागत असतील तर उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचले आहे, असे म्हटले आहे.