नवी दिल्ली : हिंदी साहित्यक्षेत्रात मोठी कामगिरी बजावणार्या लेखिका कृष्णा सोबती यांना साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या 92 वर्षीय लेखिकेला जाहीर झालेला यंदाचा हा 53वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. 11 लाख रुपये, प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आजवर कृष्णा सोबती यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1980 मध्ये ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 1996 मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली. याबरोबरच त्यांचा हिंदी अकादमी दिल्लीने 2000-2001 या वर्षीचा शलाका पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्यांनी लिहिलेल्या ‘जिंदगीनामा’, ‘ऐ लडकी’, ‘मित्रो मरजानी’ यांसारख्या अनेक कादंबर्या गाजल्या. हिंदी साहित्यात आपल्या लेखनाची भर घालून ती भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कल्पनाविलास हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
फाळणीनंतर भारतात आल्या
‘नफिसा’, ‘सिक्का बदल गया’ ‘बादलोंके घेरे’, ‘बचपन’ या कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या लघुकथाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या. त्या एक व्याख्यात्या आणि भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. 2010 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याबाबतही सरकारकडून विचारणा झाली होती; मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला. सोबती यांचा जन्म 1925 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण लाहोरमध्ये झाले. फाळणीनंतर सोबती यांनी आपल्या नवर्यासोबत भारतात वास्तव्य करणेच पसंत केले. सोबती यांच्या हिंदी लिखाणात पंजाबी आणि उर्दू शब्द सर्रास यायचे. त्यांनी कादंबरीत किंवा कथांमध्ये निर्माण केलेल्या काल्पनिक पात्रांच्या तोंडी सामान्यांना समजेल अशी भाषा आहे. त्याचमुळे त्यांची पुस्तके आणि कादंबर्या गाजल्या. ‘मित्रो मरजानी’ ही कादंबरी त्यांनी 1966 मध्ये लिहिली. या कादंबरीत विवाहित स्त्रीच्या लैंगिक भावनांचे चित्रण होते, त्यामुळे ही कादंबरी त्याकाळी चर्चेचा विषय ठरली होती. हिंदी भाषेला वेगळ्या उंचीवर नेणार्या या लेखिकेला साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.