जळगाव : भोकरच्या केळी उत्पादक शेतकर्याकडून माल खरेदी केल्यानंतरही रक्कम न दिल्याप्रकरणी दोन जणांविरूद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शेतकर्याची एक लाख आठ हजारात फसवणूक केल्याचा आरोप आहे.
दोघांविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील भोकर येथील रहिवासी रतीलाल दगा पाटील (65) हे केळी उत्पादक आहेत. भोकर शिवारातील गट नंबर 439 मध्ये त्यांची शेती असून त्यांनी केळीची लागवड केली होती व गावातील सुरेश भादू पाटील यांना त्यांना रावेर तालुक्यातील सावदा येथील व्यापारी जयराम श्यामलाल पूरभी यांना केळी विक्री करण्याबाबत सूचवले. व्यापारी जयराम पुरभी यांनी रतीलाल पाटील यांचा विश्वास संपादन करीत 4 व 5 डिसेंबर 2021 यादरम्यान रतीलाल पाटील यांच्या शेतातील 37 टन 820 किलो एवढी केळी 350 रुपये प्रतिक्विंटल या भावाने खरेदी केली. खरेदी केलेल्या केळीच्या मोबदल्यात व्यापारी पूरभी याने रतीलाल पाटील यांना एक लाख आठ हजारांचा कोरा धनादेश दिला मात्र हा धनादेश वटला (बाऊन्स) झाला. त्यानंतर तब्बल दोन ते तीन महिन्यांपासून रतीलाल पाटील यांनी व्यापार्याकडे पैशांसाठी तगादा लावला मात्र पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
अखेर पोलिसात गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी रतीलाल पाटील यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर सुरेश भादू पाटील (भोकर) व व्यापारी जयराम श्यामलाल पूरभी (रा.सावदा, ता.रावेर) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करीत आहेत.