नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) कॉल ड्रॉप आणि सेवांमधील दर्जा घसरल्याबद्दल दूरसंचार कंपन्यांना गेल्या ६ महिन्यात ५६ लाखांचा दंड केला आहे. अशी माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत याबाबतची माहिती दिली.
वारंवार कॉल ड्रॉप होणं, सेवांमधील दर्जा खालावणं, अशा काही कारणांसाठी ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना दंड केला आहे. यामध्ये टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वाधिक म्हणजे २२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीचं भारती एअरटेलमध्ये विलिनीकरण होणार आहे. आयडिया सेल्युलर आणि बीएसएनएल कंपन्यांनाही कॉल ड्रॉपसाठी दंड आकारण्यात आला आहे. आयडिया कंपनीला १२ तर ‘बीएसएनएल’ला १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी कंपनी असलेल्या ‘बीएसएनएल’ला आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २ तर दुसऱ्या तिमाहीत ४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. टेलिनॉर कंपनीलाही कॉल ड्रॉप प्रकरणी दोषी ठरवत ६ लाखांचा दंड ठोठावला आहे.
दूरसंचार कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये कमालीची वाढ होऊनही ट्रायनं सेवेतील दर्जा कायम राखण्यावर भर दिला आहे. याचाच सकारात्मक परिणाम दिसून येत असून, दूरसंचार कंपन्या देत असलेल्या सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचा दावा दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी केला आहे.