परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती
१ ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग तर ९ ऑगस्ट पासून संगणकीय आरक्षण सुविधा
मुंबई : गणेशोत्सव हा कोकणातील लोकांसाठी पर्वणीचा उत्सव असतो. कोकणात गणपतीला जाण्यासाठी लोकांचा खूप जास्त ओढा असतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई क्षेत्रातील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २ हजार २२५ बसेसची सोय केली आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.
हे देखील वाचा
या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून २ हजार २२५ बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या असून येत्या ९ ऑगस्ट ( एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत.तसेच ग्रुप बुकिंगला (संघटित आरक्षण) १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येत आहे. या ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि.८ सप्टेंबर २०१८ ते दि. १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ८ ते ९ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.
कोकणातील सावंतवाडी, मालवण,कणकवली,देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण , अलिबाग व आजूबाजूच्या परिसरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षित प्रवासासाठी आपल्या प्रवासाची तारीख व वेळ ठरवून संबंधित आगारांशी संपर्क साधावा. रा. प. बसेसचे आरक्षण करावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फ़े करण्यात आले आहे.