मुंबई: सांगली आणि कोल्हापूरात पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. लाखो नागरिकांचे जीव टांगणीला होते. प्रशासनाकडून मदत सुरु आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याठिकाणी भेटी दिल्या, मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या भागात गेलेच नाही. यावर खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सांगली आणि कोल्हापूरमधली पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाऊन मला जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती. पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचे काम सुरु आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी शिवसेनेने सांगली आणि कोल्हापूरमध्ये शिवसहाय्य मदत रवाना केल्याचे सांगितले. तसेच पूर ओसरल्यानंतर या भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेकडून या भागात डॉक्टरांची पथके रवाना करण्यात आली आहेत. याशिवाय, गुरांवर उपचार करण्यासाठीही शिवसेनेकडून १०० पशुवैद्यकांचे पथक पाठवण्यात आले आहे.
यावेळी पत्रकारांनी उद्धव यांना पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये भाजपकडून करण्यात आलेल्या जाहिरातबाजीविषयी विचारण केली. तेव्हा उद्धव ठाकरेंनी या वादांमध्ये अडकण्यापेक्षा कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच उद्धव यांनी गिरीश महाजन यांच्या सेल्फीच्या वादावरही भाष्य करण्यास नकार दिला. शिवसेना आपलं काम करत आहे. मला त्या विषयावर काहीही बोलायचे नाही, असे उद्धव यांनी म्हटले.