कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध चालतील, पण लॉकडाऊन नको

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

 

 

 

 

गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील पण लॉकडाऊन नको, अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.

 

ते म्हणाले की, निर्बंधांना विरोध नाही पण लॉकडाऊनला कोणी तयार होणार नाही. गेली दोन वर्षे विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी, उद्योजक अशा विविध घटकांनी खूप नुकसान सहन केले. हा मोठा कालावधी आहे. आता आणखी किती सहन करणार हा सवाल आहे. त्यामुळे राज्य सरकारने हवे तर कडक निर्बंध लावावेत पण सर्व काही बंद करण्याची भूमिका असू नये. तसेच कोरोनाचे स्वरुप आता भयानक नाही आणि ही साथ संपण्याची शक्यता आहे, हे तज्ञांचे मतही सरकारने ध्यानात घ्यावे.

 

पुण्यातील कोरोना आढावा बैठकांमध्ये आपण गेली दीड वर्षे उपस्थित राहिलो नसल्याबद्दल माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला. पण त्या बैठकांमध्ये अरेरावी चालते. उपस्थितांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. अशा स्थितीत बैठकांना उपस्थित राहण्याची औपचारिकता कशाला, असा सवाल त्यांनी केला.

 

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, शिवसेनेतील अस्वस्थता हळुहळू बाहेर पडू लागली आहे. काही शिवसैनिक खासगीत बोलतात तर काही नेते उघड बोलतात. शिवसेना किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खऱ्या शिवसैनिकांना फार काळ दाबून ठेऊ शकणार नाहीत. शिवसेनेला खऱ्या हिंदुत्वाकडे जावेच लागेल.