स्वरनिनाद आयोजित ’गंगाधर स्वरोत्सवा’चा समारोप
पुणे : चेहर्यावरील भाव… आवाजातील गोडवा… मंत्रमुग्ध करणारी रागदारी अन् काळजाचा ठाव घेणार्या कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुरेल गायकीने गंगाधर स्वरोत्सवाला स्वर-सौंदर्याचा साज चढला. मोहक अदाकारी आणि तितक्याच लाजवाब सुरावटींनी कौशिकी यांनी श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. गायनापूर्वी व्यक्त केलेल्या भावनांनी उपस्थितांच्या मनाचा कोपरा ओलावला.
स्वरनिनादतर्फे सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्रात आयोजित ’गंगाधर स्वरोत्सवा’चा समारोप कौशिकी चक्रवर्ती आणि श्रीनिवास जोशी यांच्या सुरेल गायनाने झाला. याप्रसंगी स्वरनिनाद संस्थेच्या संचालिका वृषाली निसळ, अॅना कंस्ट्रक्शनचे अल्पना अर्चिस अन्नछत्रे, पीआरएम इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रीतम मंडलेचा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ठुमरीने श्रोते मंत्रमुग्ध
या कार्यक्रमात सुरुवातीला श्रीनिवास जोशी यांनी शुद्ध कल्याण राग आळवला. त्यात ही बंदिश तर ख्याल गायकीचा अविष्कार सादर केला. खमाज रागातील ’छब दिखलाजा बाके सांवरिया’ या ठुमरीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शेवटी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ’माझे माहेर पंढरी’ या अजरामर भजनाने श्रीनिवास जोशी यांनी आपल्या गायनाची सांगता केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यास दाद दिली. जोशी यांना तबल्यावर निलेश रणदिवे, संवादिनीवर अविनाश दिघे, तर तानपुर्यावर ऋषीकेश सोमण, विनय चित्राव यांनी साथसंगत केली.
बंदिशीने रात्र बहरली
समारोपाच्या उत्तरार्धात कौशिकी यांनी गायलेल्या अभोगी रागातील ’कैसे कहू मन की विपदा’ बंदिशीने स्वरमयी रात्र बहरत गेली. तबल्यावर अजिंक्य जोशी, संवादिनीवर श्रीनिवास आचार्य, तानपुर्यावर संघमित्रा आणि प्रीती सोहनी यांनी साथसंगत केली. मधुरा ओक-गद्रे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.