खरचं आपण हलकट बनत आहोत!

0

आपलं सरकारही नालायक आहे. ते कोणत्याही पक्षाचं असू दे; इथं शेतीमालाचे दर वाढू लागले की सरकार निर्यातबंदी करून त्याचे दर पाडत असतं! शेतकरी मेला तर मरू दे, पण आयते खाणारे पांढरपेशी वळू फुकटाफुकटी जगले पाहिजेत! आता कांद्याच्या बाबतीत असं घडलेलं आहे. लोक एवढे हलकट की अर्धा कांदा घातलेली भजी तीस रुपयांना घेऊन खातील, पण तीस रुपयांना अर्धा किलो कांदा घेणार नाहीत. एखादी वस्तू अतिशय पाडून मागणं हा अपमानच की! याला हलकटपणाही म्हणता येईल! एवढं शिकून सवरून आपण असे हलकटच राहणार असू, तर त्या शिक्षणाचा उपयोगच काय?

माझ्या एका मित्राने विचारले, डॉक्टर, बाजारात गेल्यावर तुम्ही कधीच घासाघीस (बार्गेनिंग हा त्याने वापरलेला शब्द ) करत नाही? नाही. मी उत्तर दिलं, जे लोक स्वतःच्या जगण्यासाठी व्यवसाय करतात त्यांच्याशी कसली घासाघीस करायची? माझ्याबरोबर कधी मंडईत आलात तर तुम्हाला कळेल. मी भाजी विक्रेत्यापुढे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, मावशी, एक किलो वांगी द्या किंवा मामा, दोन किलो टोमॅटो द्या. मी कधीही त्यांना मावशी, वांगी कशी दिली? किंवा मामा, टोमॅटो काय भावाने दिली, असं विचारत नाही.

मुळात आपल्याकडे शेतीमालाचे भाव हे बर्‍याचदा उत्पादन किमतीपेक्षाही कमी असतात. उदाहरण द्यायचं तर एक किलो टोमॅटो पिकवण्यासाठी शेतकर्‍याला दहा रुपये खर्च येत असेल तर बर्‍याचदा तीच टोमॅटो आपल्याला बाजारात दहा रुपये दराने मिळतात. म्हणजे शेतकर्‍याला ती पाच रुपयांनाच विकावी लागतात. व्यापार्‍याचे पाच रुपये आणि शेतकर्‍याचे पाच रुपये. म्हणजे दर एक किलोमागे शेतकरी पाच रुपये नुकसान सोसत असतो. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला की हे असं होणारच. मागणीपेक्षा उत्पादन कमी झालं की उलटी परिस्थिती निर्माण होते. वस्तूच्या किमती वाढत जातात. अशावेळी मात्र आपण लगेच दोन्ही हातांनी बोंबलायला लागतो. आपल्याला एवढीही अक्कल नसते की आपल्यासाठी शेतकरी नेहमीच नुकसान सोसत असतो तर कधीतरी आपण स्वतःसाठी नुकसान सोसायला काय हरकत आहे?

आपलं सरकारही नालायक आहे. ते कोणत्याही पक्षाचं असू दे; इथं शेतीमालाचे दर वाढू लागले की सरकार निर्यातबंदी करून त्याचे दर पाडत असतं! शेतकरी मेला तर मरू दे पण आयते खाणारे पांढरपेशी वळू फुकटाफुकटी जगले पाहिजेत! आता कांद्याच्या बाबतीत असं घडलेलं आहे. लोक एवढे हलकट की अर्धा कांदा घातलेली भजी तीस रुपयांना घेऊन खातील, पण तीस रुपयांना अर्धा किलो कांदा घेणार नाहीत. माझी बायको पूर्वी बाजारात अशी घासाघीस करायची, मग मी तिच्याशी दोन दोन दिवस बोलणंच बंद करे.

एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी तुम्ही माझा अपमान करताय. ती म्हणायची. एवढ्या एवढ्या चार पैशांसाठी तू त्या गरिबांचा अपमान करतेस ते? मी म्हणायचो. एखादी वस्तू अतिशय पाडून मागणं हा अपमानच की! आपण लोक किती हलकट असतो त्याचं एक उदाहरण सांगतो. आम्ही दोस्त दोस्त परवा असंच फिरायला गेलो. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स तुडुंब खाल्लं. प्रत्येकी तीनशे बिल झालं. सर्वांनी ते आनंदानं दिलं. पोट हलकं करण्यासाठी आम्ही मग रस्त्याने फिरू लागलो. एके ठिकाणी एकदम फ्रेश करवंदे दिसली. टपोरी, काळीभोर. आमचा एक मित्र पुढं झाला आणि त्यानं पहिला प्रश्‍न विचारला, करवंदे कशी दिली? दहा रुपयांना एक द्रोण! म्हातारी म्हणाली, पाच रुपयांना एक देणार काय? देत असशील तर पाच घेतो बघ. आमचा दोस्त म्हणाला. करपलेला, आबवलेला मैदा पिझा नावानं दीडशे रुपयांना खायचा आणि एवढं डोंगरात जाऊन वेचून आणलेली करवंदे पाच रुपयांना मागायची हा आपला दरिद्रीपणाच नाही काय? याला हलकटपणाही म्हणता येईल!
एवढं शिकून सवरून आपण असे हलकटच राहणार असू तर त्या शिक्षणाचा उपयोगच काय? शेतकर्‍यांकडून खरेदी करणारे आपण मॉलमध्ये वा मोठमोठ्या शॉपिंग सेंटरमध्ये मात्र ते म्हणतील त्या किमतीला अत्यंत टाकावू वस्तूसुद्धा खरेदी करतो, अशा वस्तू वा कपडे की जे अगदी आठवड्यातसुद्धा खराब होतात किंवा घरी आणल्या आणल्या मुलांनी त्याचा बोर्‍या वाजवलेला असतो, असे खर्च आपल्याला आपल्या प्रतिष्ठेला परवडतात, मग एखादी भाजीवाली घरोघरी जाऊन भाजी विकते तेव्हा तिचा भार हलका करण्यापेक्षा तिच्याशी किमतीत घासघीस करणे आपल्याला अधिक सोयीचे वाटते. मी काहींच्या अशाही सवयी ऐकल्या आहेत की जे शक्यतो महिला विक्रेत्यांकडे कधीच घासाघीस करीत नाहीत, कारण त्यांना माहीत असते, की तिच्या कमाईवरच तिचे घर चालते. आपणही असा प्रयत्न करू यात.

डॉ. अशोक माळी