जळगाव । विज्ञानाची भिती घालवून आत्मविश्वास निर्माण करण्यास आणि भविष्यातील संशोधनाच्या वाटा शोधण्यास कार्यशाळेचा भरपूर फायदा झाला असून यातूनच आम्हा विद्यार्थ्यांमधून खान्देशात चांगले संशोधक निर्माण होतील असा विश्वास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधन वृध्दी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या उपस्थितीत व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी 1 ते 10 जून 2018 या दरम्यान संशोधन वृध्दी जोपासण्यासाठी उन्हाळी कार्यशाळा (समर वर्कशॉप) आयोजित केली होती.
दहा दिवसाच्या शिबीरात विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया
या कार्यशाळेचे हे दुसरे वर्ष होते. रविवार 10 जून रोजी उद्योजक छबीराज राणे व व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. दहा दिवसाच्या या कार्यशाळेविषयी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयातील विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी करुन विज्ञानाविषयी आस्था निर्माण करुन दिली. देशभरातील नामवंत तज्ज्ञांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन केले. त्याचा फायदा आत्मविश्वास वाढण्यात झाला. भविष्यात विज्ञानाचे संशोधन सुरु राहिल असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. श्री.राणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक होण्याविषयीच्या टिप्स् दिल्या. दिलीप पाटील यांनी या विद्यार्थिभिमुख उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करुन अशा उपक्रमांसाठी अर्थसंकल्पात अधिक तरतूद केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पाटील यांनी या कार्यशाळेला दरवर्षी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि अशा कार्यशाळांमधूनच उद्याचे संशोधक निर्माण होणार आहेत असे मत व्यक्त केले. प्रा.एस.टी.बेंद्र यांनी प्रारंभी या कार्यशाळेचा आढावा घेतला. समन्वयक प्रा.एच.एल.तिडके यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रध्दा परदेशी आणि कुणाल मानकर या विद्यार्थ्यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.रत्नमाला बेंद्रे यांनी आभार मानले. सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.