मुंबई-राज्य सरकारने शिक्षण सम्राटांना मोठा दणका दिला आहे. सरकारने अनेक दिवस रखडलेला खासगी शाळांमधील शिक्षक भरतीचा निर्णय जाहीर केला आहे. खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती आता राज्य सरकारमार्फत करण्यात येणार आहेत. सरकारने २३ जून २०१७ रोजी हा निर्णय घेतला होता. मात्र राजकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी होत नव्हती. पण आता दरवर्षी मे महिन्यात खासगी शाळांमधील शिक्षक भरती राज्य सरकारच करणार आहे. शिक्षक भरतीसाठी पवित्र व्हिजिबल टू ऑल टिचर्स या पोर्टलचा उपयोग केला जाणार आहे.
शिक्षण सेवकांना कोणती संस्था मिळेल त्याचंही नियंत्रण राज्य सरकारकडे असेल. समायोजन झाल्यानंतर वर्षातून दोन वेळा शिक्षणसेवकांची भरती होईल. राज्य सरकार अभियोग्य आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित शिक्षणसेवकांची खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र शाळांत नियुक्ती करणार आहे. मात्र अशा भरती प्रक्रियेतून अल्पसंख्याक वर्गाच्या शाळांना वगळले आहे. पहिली खासगी संस्थेतील भरती १२ डिसेंबर २०१७ ते २१ डिसेंबर २०१७ या कालावधीत झालेल्या परीक्षेवर आधारित असेल.
२४ हजार जागा भरणार
सरकारच्यावतीने जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिकेचे आयुक्त सरकारकडून भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. आगामी सहा महिन्यात राज्यात शिक्षकांच्या २४ हजार जागा भरल्या जाणार आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. फेब्रुवारी महिन्यात ते ‘माझा कट्टा’वर आले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली होती.