पहाटे 5.30 वा. महापौरांच्या उपस्थितीत कारवाई ; पोलिसांचा मोठा फौजफाटा
जळगाव: शहरातील ख्वाजामियाँ चौकात गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले वादग्रस्त अतिक्रमण त्या समाजातील बर्याचशा लोकांना विश्वासात घेत महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. दोन्ही अतिक्रमण हटविल्याने ख्वाजामियाँ चौक ते गणेश कॉलनी रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
गणेश कॉलनी मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. नगरसेविका दीपमाला काळे यांनी हे अतिक्रमण हटविण्यसाठी आंदोलन देखिल केले होते. अतिक्रमण हटविल्याने रस्ता मोकळा होऊन नागरिकांना रहदारीस अडथळा होणार नाही याबाबत त्या समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन गुरुवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात आले. सकाळी 5.30 वाजताच महापौर भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मनोज काळे पोलीस फौजफाट्यासह पोहचले.
दुवा पठण केल्यानंतर अतिक्रमण काढले
विधीवत दुवा पठण करून काढले अतिक्रमण सकाळी 6 वाजता मनपाच्या दोन कर्मचार्यांनी त्याठिकाणी दुवा पठण केली त्यानंतर तेथील चादर आणि इतर साहित्य एका बाजूला ठेवण्यात आले. मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि जेसीबीच्या साहाय्याने ते अतिक्रमण हटविण्यात आले. ख्वाजामियाँ दर्ग्याच्या बाहेर असलेले जुने लोखंडी गेट देखील मनपाने महापौरांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कालंका माता चौकानेही घेतला मोकळा श्वास
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महामार्गालगत असलेले अतिक्रमण काढण्याच्या सुचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या. शहरातील महामार्गालगत कालंका माता चौकात भाजीवाले, पानटपर्या, दुध बुथ, सलुनच्या दुकानांनी अतिक्रमण केले होते. दोन दिवसांपासून या ठिकाणच्या व्यावसायिकांना सुचना देण्यात आल्या होत्या. काहींनी स्वत:हुन अतिक्रमण हटविले. मात्र ज्यांनी हटविले नाही त्यांच्यावर आज मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात येऊन जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आल्याने कालंका माता चौकानेही मोकळा श्वास घेतला.