मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा
नागपूर : पंढरपूरला काशीचे स्थान असल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्येष्ठ महिन्यात व इतर वारीच्या काळात लाखो भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. चंद्रभागा नदीत दुर्गंधीयुक्त, प्रदूषित पाणी येऊ नये, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी येत्या 24 महिन्यात एकात्मिक सांडपाणी प्रकल्प तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.
हे देखील वाचा
चंद्रभागेत दुर्गंधीयुक्त व प्रदूषित पाणी येत असल्याने भाविकांच्या आरोग्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, वारीच्या काळात पंढरपूर शहरात व आजूबाजूच्या परिसरात भाविकांची गर्दी असते. शहराला 26 एमएलडी पाण्याची गरज असून 19 एमएलडी पाणी पुरवठा होतो. पाण्याचा निचरा करण्यासाठी यातील साडे पंधरा एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय भुयारी गटारीची संख्याही अपुरी आहे. ‘नमामी चंद्रभागा’ च्या माध्यमातून 2049 सालापर्यंतच्या शहराची गरज लक्षात घेऊन सांडपाणी एकात्मिक प्रकल्प 7 फेब्रुवारी 2018 रोजी मंजूर करण्यात आला असून यासाठी 59.75 कोटी रूपयांचा निधीही वितरित केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, वारीच्या निमित्ताने त्या-त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मंदिर समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून वेगळी यंत्रणा उभारून स्वच्छतेसाठी व्यवस्था उभी केली आहे. दौंड, बारामती, शिरूर, पुणे, आळंदी, पिंपरी चिंचवड या शहरांना सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच सोडावेत, असे आदेश दिले आहेत. वारीच्या ठिकाणी ‘मोबाईल शौचालयांची’ उभारणी करण्यात आली असून त्यांची संख्या व स्नानगृहांची संख्याही वाढविण्यात आली आहे. शिवाय सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प (एसटीपी) या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता राखण्याचे व तपासण्याचे कामही करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
