चाकण : सकल मराठा समाजाच्यावतीने चाकण शहरामध्ये आरक्षणाच्या मुद्यावर जोरदार आंदोलन सुरू होते. आरक्षणाच्या घोषणा देत मराठा समाजाचे आंदोलन शांततेत सुरू होते. मात्र अचानक काय घडले माहिती नाही आणि मारामारी, गाड्यांची तोडफोड सुरू झाली. सगळ्या जिल्ह्यामध्ये शांततेत मोर्चे, आंदोलने सुरू होती. मग चाकणमध्ये असा हिंसाचार का घडला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चाकणमधील मराठा आंदोलन दुपारी दीड वाजता संपले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास आंदोलन पेटले. त्यामुळे झालेल्या हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आंदोलनाच्या नावाखाली हिंसक कारवाया
आयुक्त पद्मनाभन म्हणाले की, चाकण येथे 30 जुलै रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन झाले. हे आंदोलन दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान संपले. त्यानंतर काही समाजकंटकांनी आंदोलनाच्या नावाखाली हिंसक कारवाया केल्या. तोडफोड करणार्यांचे फोटो आणि चित्रफीत पोलिसांच्या हाती लागली असून त्यानुसार कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यामुळे त्यांची पळापळ झाली आहे. मात्र आता ते मराठा आंदोलकांच्या नावाखाली आश्रय घेत आहेत. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच माझी भेट घेतली. त्यावेळी त्यांना वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्यांचे फोटो दाखविले. हे तुमचे आंदोलक आहेत का, याबाबत त्यांना विचारले होते. त्यावेळी असता यापैकी एकही आमचा कार्यकर्ता नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे चाकण हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही आयुक्त पद्मनाभन म्हणाले.