चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली: संजय राऊत

0

मुंबई:चीनने केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले. यावरून भारत- चीन देशाचे संबध ताणले गेले आहे. याविषयी नवनवे प्रश्न सरकारला विचारले जात आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित असून, चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली,” अशी टीका केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनात लिहिलेल्या लेखातून गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे. मोदी सरकारच्या धोरणांचं विश्लेषण करण्याबरोबरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत वाढलेल्या जवळकीवर टीका केली आहे. “चीनने आपले २० सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. की बदला घेण्यासाठी, सर्जिकल स्ट्राइक करून विजयी डंका पिटण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे? २० जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले? गडबड, गोंधळ सीमेवर नसून दिल्लीतच आहे, असे फार पूर्वी मोदी म्हणाले होते, ते आता पटले! चीनशी आपले भांडण न संपणारे आहे; कारण या भांडणाचा सरळ संबंध आपण अमेरिकेशी ठेवलेल्या संबंधांशी आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.