जगभर मानवतावाद रूजला पाहिजे

0

पुणे । धर्म हा आपापल्या आयुष्यातील खासगी विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी माणूस या नात्याने समान पातळीवर संवाद साधून सलोखा निर्माण केला पाहिजे. एकविसाव्या शतकात चांगल्या समाजाची निर्मिती करायची असेल, तर जगभर मानवतावाद रुजवला पाहिजे, तसेच वैश्‍विक एकतेची भावना प्रबळ व्हावी असे प्रतिपादन अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी केले. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय दुसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. राहुल कराड, प्रा. नंदकुमार निकम, डॉ. सुधाकर जाधवर, प्रा. मंगेश कराड, डॉ. जय गोरे, प्रा. दीपक आपटे, प्रा. डॉ. रविकुमार चिटणीस, धनराज माने, प्रा. शरदचंद्र दराडे आदी उपस्थित होते.

‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
आयआयटी थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक समन्वयक प्रा. कस्तुरीलाल चोप्रा, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, आयआयटी मुंबईचे माजी सहसंचालक प्रा. एस. सी. सहस्त्रबुद्धे व आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, स्मृती चिन्ह व ज्ञानेश्‍वर माऊलीची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

दलाई लामा म्हणाले, आपापसांतील संवादातून विचारांची देवाण-घेवाण होते. समाजात शांतता प्रस्थापित होते. पुरातन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये नैतिक मूल्यांची शिकवण आहे. आजची शिक्षणपद्धती फक्त तंत्रज्ञानावर आधारित असली, परंतू यामध्ये संवाद फार महत्वाचा आहे. शिक्षण पद्धतीत भावनिक प्रश्‍नांतून मार्ग कसा काढायचा, याचा समावेश व्हायला हवा. आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान, पुरातन शिक्षण आणि भावना यांची सांगड घालण्याची क्षमता केवळ भारताकडे आहे. गुरुकुल शिक्षणपद्धतीत शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील संवाद आणि शिकण्या-शिकविण्याची प्रथा अधिक चांगली होती. टीचर्स काँग्रेसच्या माध्यमातून शिक्षकांच्या दृष्टीकोनाचे आदान प्रदान होईल. त्यातून शिक्षणव्यवस्थेचे सक्षमीकरण तर होईलच; शिवाय, शासनालासुद्धा एक प्रकारची दिशा मिळेल.

विविध शैक्षणिक संस्थांचे सहकार्य
महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), युनेस्को अध्यासन आणि असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन या संस्थांच्या सहकार्याने ही नॅशनल टीचर्स काँग्रेस आयोजित करण्यात आली आहेे.

बदलांची देवाणघेवाण
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, आपण आज ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. त्यामुळे पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये बदल व्हायला हवेत. संशोधनात्मक शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांची देवाणघेवाण झाली आणि शिक्षण व औद्योगिक क्षेत्र एकत्रित आले, तर राष्ट्रउभारणीचा वेगही वाढेल

मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अवलंब
प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, मूल्याधिष्ठित वैश्‍विक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची आज वेळ आली आहे. त्यातूनच सर्व जगात शांतता निर्माण होण्यास मदत होईल. जगभरातले विचारवंत याच निष्कर्षाला येऊ लागले आहेत.

शिक्षकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ
मुक्ता टिळक म्हणाल्या, देशाच्या विकासाचा आधारस्तंभ तरुण पिढीला घडविणार्‍या शिक्षकांसाठी हे अतिशय महत्त्वाचे व्यासपीठ आहे. प्राथमिक व उच्च शिक्षणात येणार्‍या विविध अडचणी या व्यासपीठावर मांडता येतील. प्रा. डॉ. रविकुमार चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. निकम यांनी आभार मानले.