जयकुमार रावल भूमाफिया, मंत्रिमंडळातून हकला!

0

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – भाजपमधील मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करत आहेतच शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीही जमीन बळकावली असून रावल यांना धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन त्यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी त्याचबरोबर त्यांना मदत करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

शेतकऱ्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी केली
मलिक यांनी सांगितले की, १९७६ मध्ये भूसंपादन कायदा आल्यानंतर एखादयाकडे ५० ते ५२ एकरच्यावर जमीन ठेवता येत नसताना रावल यांच्याकडे दोंडाईचा येथे वेगवेगळी कुटुंब दाखवत ८०० एकर जमीन उपलब्ध आहे. इतका मोठा भूसाठा कसा. यांची जमीनीची भूक संपत नाही हे यावरुन दिसत आहे.जयकुमार रावल यांचे दोन जिल्हयामध्ये भूमाफियासारखे काम सुरु आहे. शेतकऱ्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी करायची आणि करोडो रुपयांनी विकायची असा धंदा रावल आणि कंपनीचा सुरु असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.२००६ साली ४ हेक्टर जमीन बहाणे नावाचा गाव आहे तिथे पंचरत्ना रावल या नावाने संपादीत जमीन घेतली. आणि त्या जमीनीवर १ कोटी रुपयांचा मोबदला घेतला याचे पुरावे आमच्याकडे आहेत. याबाबतची तक्रार मुख्यमंत्री, जिल्हयाचे पोलिस अधिक्षक आणि एसीबीकडे करण्यात आल्यावर कारवाईला सुरुवात झाली मात्र मुख्यमंत्र्यांनी दबाव आणत ही कारवाई थांबवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

माजी राष्ट्रपतींना मागावी लागतेय न्यायालयात दाद
शिंदखेडा आणि परिसरातील जमीन ही २००९ मध्ये भूसंपादीत झाली. कायदयाने नोटीफिकेशन निघाल्यानंतर जमीन खरेदी करता येत नाही. तरीही रावल यांनी १.७६ हेक्टर जमीन २० एप्रिल २०१२ ला २ लाख ८३ हजार रुपयांना खरेदी केली. कायदयाने नोटीफिकेशन झाले असताना रजिस्टारने दस्ताऐवज तयार केला कसा. जमीनीचा फेरफार कसा करण्यात आला. याचा अर्थ जमीन खरेदी झाली म्हणजे तो बेकायदेशीरपणे जमीन व्यवहार झाला असा आमचा आरोप आहे. जयकुमार रावल आणि त्यांची कंपनी एखादया भूमाफियासारखी दहशत पसरवत आहे. शेतकऱ्यांना सोडत नाहीच आहे शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांच्या चार भावांची २७ एकर जमीन बळकावली आहे. आज माजी राष्ट्रपतींना न्यायालयात दाद मागावी लागत आहे इतका धुमाकुळ सुरु आहे. रावल यांच्याबाबत लेखी तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत परंतु मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करत आहेत शिवाय एसीबीवरही कारवाई न करण्याबाबत दबाव आणत आहेत असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.