जय मल्हार ग्रुपकडून मिळतोय वडगावकरांना गड संवर्धनाचा संदेश

0

युवा पिढीला गड-किल्ल्यांचा इतिहास लक्षात रहावा या उद्देशातून देखावा साकारला

दुसर्‍या दिवसापासून देखावा उपलब्ध

वडगाव मावळ : येथील खंडोबा चौकातील जय मल्हार ग्रुप मित्र मंडळाच्यावतीने यावर्षी गणपती उत्सवात ‘गड संवर्धन’ या ज्वलंत विषयावर देखावा सादर करण्यात आला आहे. गड-किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, तसेच आजच्या युवा पिढीला गड-किल्ल्यांचा इतिहास लक्षात रहावा, या उद्देशातून हा देखावा साकार करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष आफताब सय्यद आहे. संस्थापक विशाल वहिले आणि मंगेश खैरे आहेत. देखावा साकारण्यासाठी तुषार वहिले, गणेश वायकर, संदीप ढोरे, नितीन जाधव, स्वप्नील वाघमारे, शिवलाल दुबे, लौकिक सासवडकर, रोहित गिरमे, अतुल चव्हाण, संतोष देशमुख, सोनू पिंजण, गणेश सुतार, श्रेयस सिरसाट, चेतन परदेशी, शैलेश खैरे, पूजा वहिले, रुपाली खैरे, कीर्ती वहिले, कांचन ढमाले, हर्षदा दुबे, प्रमिला वहिले, ओंकार पिंजन आदी सदस्यांनी प्रयत्न केले आहेत. उत्सावाच्या दुसर्‍या दिवशी देखावा गणेशभक्तांना पाहण्यासाठी सुरु करण्यात आला. वडगावकर तसेच पंचक्रोशीतील गणेश भक्तांची देखावा पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होत आहे.

गड-किल्ल्यांचे वैभव संपले

महाराष्ट्रासाठी गड किल्ल्यांचे महत्व अनोखे आहे. त्यांचा इतिहास सदैव प्रेरणा देणारा आहे. अविस्मरणीय इतिहास या गड-किल्ल्यांवर घडला आहे. परंतु हेच गड-किल्ले आज अनेक प्रकारच्या संकटांमध्ये सापडले आहेत. गड किल्ल्यांवर मद्यपान करणे, पार्ट्या करणे, अश्‍लील कृत्ये, भितींवर नको त्या गोष्टी लिहिणे यामुळे गड-किल्ल्यांचे वैभव संपत चालले आहे. तसेच गड-किल्ल्यांवर होणारा कचरा देखील अतिशय त्रासदायक समस्या आहे. पार्टी करण्यासाठी गडावर जाऊन सगळा कचरा तसाच टाकून येतात. त्यामुळे आपला इतिहास संकटात असून त्याची जाणीव करून देणारा देखावा जय मल्हार ग्रुपने साकार केला आहे.

मंडळाचे जनजागृतीपर उपक्रम

मंडळाच्यावतीने आज (रविवारी) तिकोना गडावर गड संवर्धन मोहीम काढण्यात आली. सोमवारी (दि. 17) महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर राबविण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. 18) महापूजा आणि वृक्षवाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि. 19) गणपती बाप्पांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.