गुंडाच्या टोळ्यांशी मंत्र्यांचे घनिष्ठ संबंध; भाजपाने 28 जागांवर गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा दावा
धुळे- धुळे महापालिकेची निवडणूक भयमुक्त व मोकळ्या वातावरणात होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांना जिल्हाबंदी करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. संशयीत आरोपी विनोद थोरात यास चाळीसगाव येथे अटक केल्यानंतर त्याच्यासोबत धुळ्यातील दोन तर जळगाव येथील एक अशा तीन मंत्र्यांचे फोनवर झालेल्या संभाषणाची सीडी आपल्याकडे असून मंत्र्यांसह त्यांचे स्वीय सचिव आणि काही पदाधिकार्यांची नावे आपल्याकडून या सर्वांना धुळे जिल्हा बंदी करण्यात यावी तसेच या सर्वांचे व शासकीय अधिकार्यांचे दुरध्वनी निरीक्षणांखाली ठेवण्यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आमार अनिल गोटे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे शिवाय त्याबाबतची माहिती त्यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परीषदेत दिली. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास सोमवारी संभाषणाची ध्वनीफीत प्रसार माध्यमांकडे सोपविणार असल्याचेही आमदार गोटे म्हणाले. आठ मिनिटांची ही संभाषण क्लीप असल्याचे ते म्हणाले.
तीन मंत्र्यांना करावी धुळे जिल्ह्यात बंदी
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यासह नाना कर्पे, हिरामण गवळी, अनुप अग्रवाल व सर्व मंत्र्यांचे स्वीय सचिव ह्यांना धुळे जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्याबाबत तसेच या सर्वांचे व शासकीय अधिकार्यांचे दुरध्वनी निरीक्षणांखाली ठेवण्यात यावे, अशी मागणी आमदार गोटे यांनी केली आहे. संशयीत आरोपी विनोद थोरात यास चाळीसगाव येथे अटक केल्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचे फोन विनोद थोरात यांच्या फोनवर आले आहेत. संबंधीत एका पोलीस अधिकार्याने मोबाईलवर केलेल्या संभाषणाची ध्वनीफित, सीडी निवेदनासोबत जोडल्याचे ते म्हणाले. धुळे महापालिकेची निवडणूक प्रक्रिया मुक्त वातावरणांत व कुठल्याही दबावाखाली न होता मुक्त वातावरणात झाल्या पाहिजेत. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने 74 पैकी 62 जागांवर कमळाच्या अधिकृत चिन्हांवर उमेदवार दिले आहेत. त्यातील 28 उमेदवार हे सराईत गुन्हेगार आहेत. अनेकांवर 302, 395 आणि 307 या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हंचे आरोपी आहेत. वरील तीनही मंत्र्यांचे शहरातील गुंडाच्या टोळ्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेने महापालिका निवडणूकीची जबाबदारी तीनही मंत्र्यांवर सोपविली आहे. सराईत गुंडांशी असलेले संबंध व अधिकाराचा सर्रास दुरुपयोग करण्याची मानसिकता असल्याने ही निवडणूक मोकळ्या वातावरणात होवूच शकत नाही. असे ही आमदार गोटे म्हणाले. शेजारच्या नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात कुठलीही निवडणूक नसतांना धुळे महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकार्यांची नेमणूक करताना 10 पैकी तब्बल सहा अधिकारी हे जळगाव जिल्ह्यातील असल्याचे त्यांनी सांगत भाजपाने जळगाव पॅटर्न धुळ्यात सुरू केला असून निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे, असेही निवेदनात आमदार गोटे यांनी स्पष्ट केले आहे.